पालघर येथील नविन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण

आदिवासी संस्कृती व परंपरांचे जतन करुन पालघर जिल्ह्यातील विकासकामे करावीत  – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

लोकाभिमुख विकासकामांना प्राधान्य देऊन नविन इमारतीचा नावलौकिक वाढवावा

पालघर प्रतिनिधी  : जिल्ह्यातील आदिवासी संस्कृती व कला देशामध्ये प्रसिद्ध आहेत. वारली चित्रकला तर जागतिक स्तरावर पोहचली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आदिवासी संस्कृती व जिल्ह्यातील परंपरा यांचे जतन करून विकासकामे करावीत. नविन इमारतीचा नावलौकिक वाढवावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. नविन सुसज्ज जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नविन सुसज्ज इमारतीचे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे बोलत होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (ऑनलाईन), महसुल मंत्री बाळासाहेब थोरात (ऑनलाईन), नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महसुल व ग्रामविकास मंत्री अब्दूल सत्तार, पालघर जिल्हा परिषद अध्यक्षा वैदही वाढाण, खासदार राजेंद्र गावीत, सर्वश्री आमदार श्रीनिवास वनगा, सुनिल भुसारा, राजेश पाटील, विनोद निकोले, रविंद्र पाठक, मुख्य सचिव सिताराम कुटे(ऑनलाईन), कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, कोकण परिक्षेत्र  उपमहानिरिक्षक संजय मोहिते, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधिक्षक दत्तात्रेय शिंदे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, जिल्ह्याला सागरी, डोंगरी भूभाग लाभला असल्याने नैसर्गिक आपत्तीचा धोका कायम असतो. तौक्ते चक्रीवादळामुळे जिल्ह्यामध्ये नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून नुकसानग्रस्तांना मदतवाटपाचे काम सुरू आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने कोरोना काळात केलेल्या उपाययोजनामुळे जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा प्रशासनाने ऑक्स‍िजन प्रकल्प उभारला आहे. ऑक्स‍िजन बाबतीत जिल्हा स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. येणाऱ्या कोणत्याही नैसर्गिक संकटात तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पालघर जिल्ह्याच्या आदिवासी संस्कृतीला व परंपरेला चालना देण्याचे काम जिल्हा प्रशासनाने करावे. जिल्ह्यामध्ये वनसंपदा आहे. औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती आहेत. जिल्ह्यातील महत्त्वाचे फळ चिकु सातासमुद्रापार गेले आहे. वारली चित्रकला जगप्रसिद्ध आहे. या सर्व घटकांना गती देऊन जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण करावी. जिल्ह्यामध्ये औद्योगिकरण झाल्यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. जिल्ह्यातील उद्योग वाढावेत यासाठी उद्योजकांना विविध सवलती देऊन गुंतवणुक करण्यास उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात येईल.

   पावसाची परिस्थिती असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात तौक्ते चक्रीवादळादरम्यान समुद्रात गेलेले मच्छिमार यांना परत समुद्रकिनारी आणल्याने जिल्हा प्रशासनाच्या कार्यतत्परतेमुळे जिवितहानी टाळता आली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या काळात नविन इमारतीचे लोकार्पण होत आहे. ही बाब अभिमानास्पद असून नविन इमारतीत येणाऱ्या नागरिकांची कामे तात्काळ होतील अशी दृढ इच्छा आपण मनामध्ये बाळगली तर ही भव्य सुसज्ज इमारत देशामध्ये आगळीवेगळी ओळख निर्माण करेल असा विश्वासही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.जिल्हा प्रशासनामार्फत पालघर जिल्ह्यात एकूण 13 शिवभोजन केंद्र मंजूर असून त्यापैकी सद्यस्थितीत 9 शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. या शिवभोजन केंद्रातून सध्या प्रतिदिन 3000 थाळी मोफत शिवभोजन केंद्रावर लाभार्थ्यांना वाटप करण्यात येत आहे. योजनेअंतर्गत आजपर्यंत 9,10,771 थाळयांचा लाभ लाभार्थ्यांनी घेतलेला आहे. या योजनेस पालघर जिल्ह्यामध्ये मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, नविन वास्तुमध्ये काम करताना नागरिकांच्या गरजांकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे. नविन वास्तू जनतेच्या सेवेसाठी असल्याने अधिकारी व नागरिकांमधील बांधिलकी टिकणे महत्त्वाचे आहे. जव्हार येथिल राजवाड्याच्या कलाकृतीवरून सिडकोने निर्माण केलेली जिल्हा प्रशासनाची ही भव्य वास्तू साकारण्यात आली आहे. अशी शासकिय कार्यालयाची वास्तू संपूर्ण देशात नाही. या वास्तूमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सर्व समाजघटकांना समान न्याय देऊन जिल्ह्याचा विकास साधावा. या वास्तूमुळे जिल्ह्याच्या विकासांना चालना मिळेल असा विश्वासही  पवार यांनी व्यक्त केला.

        कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या जिल्ह्यामध्ये नविन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याने विकासाच्या नविन पर्वाला सुरूवात झाली आहे. प्रशासकीय इमारतींमध्ये साधारणत 60 जिल्हास्तरीय कार्यालये स्थापीत होणार आहेत. आज रोजी पालघर जिल्ह्यामध्ये एकूण 41 शासकीय कार्यालये स्थापन झाली असून, उर्वरित 23 विभागांची कार्यालये लवकर स्थापन होणे आवश्यक आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, आदिवासी विकास भवन, महिलांसाठी One Stop Centre यांचेकरिता जागा उपलब्ध करून देवून या इमारतींचे बांधकाम येत्या 2 वर्षांमध्ये पूर्ण करण्याचा मानस असल्याचे पालकमंत्री भुसे यांनी सांगितले. मौजे टेंभोडे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागास 2 एकर जागा देण्यात आली आहे. मौजे सरावली येथे सुसज्ज ग्रामीण रूग्णालय बांधण्याकरीता 1.5 एकर जागा प्रदान करण्यात आली आहे. JSW कंपनी CSR निधीमधून यासाठी 25 कोटी निधी उपलब्ध करून देणार आहे. मौजे उमरोळी येथे जिल्हा कारागृहासाठी 25 एकर जागा, ग्रामीण विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रास (RSETI) 2 एकर जागा तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयास 5 हेक्टर (12.50 एकर) जागा प्रदान करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये "स्त्री रुग्णालय" स्थापन होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात 5 एकर जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

     स्थानिक खेडाळूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी मौजे टेंभोडे येथे 16 एकर जागेमध्ये राष्ट्रीय दर्जाचे जिल्हा क्रिडासंकुल विकसित करण्यात येत आहे. मौजे अल्याळी येथे 4 एकर जागा क्रिडांगणाकरीता पालघर नगरपरिषदेच्या ताब्यात देण्यात आली आहे. मौजे अल्याळी, नवली, टेंभोडे येथील तलाव व पालघर शहरातील गणेश कुंड बगीचा क्षेत्र विकास करण्यासाठी पालघर नगरपरिषदेच्या ताब्यात देण्यात आली आहे. तौक्ते चक्रिवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यात 3 व्यक्ती मृत्यू व 4 व्यक्ती जखमी झालेल्या आहेत. 14350 शेतकऱ्यांचे 6100 हेक्टर क्षेत्रावर शेती पिके/ फळपिकांचे नुकसान झालेले आहे. 95 घरांचे पूर्णत: तर 14312 घरांचे अशंत: पडझड होऊन नुकसान झालेले आहे. तसेच 53 बोटींचे नुकसान झाले असून, नुकसानीसाठी शासनाकडून विशेष दराने मदत जाहिर करून जिल्ह्याला 51 कोटी 51 लाख इतके अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार  यांचे आभारही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी मानले.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८