उर्वरित पात्र शेतकऱ्यांना जुलै अखेरपर्यंत लाभ
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील
सहकार मंत्री बाळासाहेब पाटील
मुंबई प्रतिनिधी : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची रक्कम वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून जुलै अखेरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळेल, असे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
सहकार मंत्री म्हणाले शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. या योजनेची अंमलबजावणी सुरू असतांना देशासह राज्यात कोविड-१९ चे महासंकट आले. त्यामुळे राज्यामध्ये लॉकडाऊन जाहीर झाला. कोविड-१९ चा प्राद्रुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या आणि तिसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास उशीर झाला.
सध्या खरीप परेणीचा हंगाम सुरू झाला आहे. तिसऱ्या यादीतील राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळावा यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी २ हजार कोटी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. जुलै अखेरपर्यंत सव्वा आकरा लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात रु. ८ हजार २०० कोटी रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.
ज्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा अद्याप लाभ मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे सहकार मंत्री यांनी आवाहन केले.
दरम्यान कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम यादीत नाव असलेल्या मात्र कोविड-१९ च्या संकटामुळे कर्जमुक्तीचा लाभ न मिळालेल्या कर्जदार शेतकऱ्यांना खरीप कर्ज द्यावे अशा सूचनाही शासनाने बँकांना दिल्या होत्या असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८
घरी थांबा, कोरोना टाळा, कोरोना योध्दासह पोलिसांना सहकार्य करा,अफवांना बळी पडू नका, आपणच घेऊ आपली काळजी 🙏