कन्हाळगाव अभयारण्यासह संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता

कन्हाळगाव अभयारण्यासह 10 नवीन संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता


राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय


पर्यावरण संवेदनशील क्षेत्र अंतिमतः घोषित  झाल्यानंतर त्याचा झोनल मास्टर प्लॅन तीन महिन्यात तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश



मुंबई प्रतिनिधी : चंद्रपूर  जिल्ह्यातील कन्हाळगाव (एकूण क्षेत्र 269  चौ की.मी.) अभयारण्य घोषित करण्यासह राज्यातील 10 नविन संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य वन्य जीव मंडळाच्या 16 व्या बैठकीत घेण्यात आला. राज्यात घोषित  करण्यात आलेली नवीन 10 संवर्धन राखीव क्षेत्र पुढीप्रमाणे आहेत.आंबोली दोडा मार्ग संवर्धन राखीव- सिंधुदुर्ग,चंदगड संवर्धन राखीव-कोल्हापूर,आजरा- भुदरगड संवर्धन राखीव- कोल्हापूर,गगनबावडा संवर्धन राखीव- कोल्हापूर,पन्हाळगड संवर्धन राखीव- कोल्हापूर,विशाळगड संवर्धन राखीव- कोल्हापूर,जोर जांभळी संवर्धन राखीव-सातारा, मायणी क्लस्टर संवर्धन राखीव- सातारा अशा पश्चिम घाटातील  8 संवर्धन राखीव  क्षेत्रांना मान्यता देण्यात आल्यामुळे वन्यजीवांचा भ्रमण मार्ग मोठ्या प्रमाणात संरक्षित झाला आहे. या आठ तसेच विदर्भातील महेंद्री व मुनिया  या क्षेत्रासही संवर्धन राखीवचा दर्जा देण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली.


झोनल मास्टर प्लॅन तीन महिन्यात तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश


      पर्यावरण संवेदनशील क्षेत्र अंतिमतः घोषित  झाल्यानंतर त्याचा झोनल मास्टर प्लॅन जिल्हाधिकाऱ्यांनी तीन महिन्यात तयार करावा. हे करताना वन, पर्यावरण, महसूल, नगरविकास अशा संबंधित विभागाचे सहकार्य  घ्यावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. चांदा ते बांदापर्यंत जे महाराष्ट्राचे वन वैभव आहे त्याचे विविध ऋतूतील वैशिष्ट्य टिपण्यास वन रक्षकांना सांगावे, त्याचा दर्जा उत्तम राखावा,  यावरून राज्यासाठी आपण एक चांगली फिल्म तयार करू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  राज्यात पूर्वीचे 6 आणि नवीन घोषित तिलारी अशी मिळून 7 संवर्धन राखीव आहेत. त्या क्षेत्रात महत्वाची कामे करण्यासाठी 20 कोटी रुपयांचा निधी द्यावा या वन विभागाच्या मागणीवर प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.


      बैठकीत राज्य वन्य जीव मंडळाच्या सदस्यांनी ज्या सूचना केल्या त्याचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले. वाघाप्रमाणे बिबट्या आणि मानव संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना सुचवाव्यात त्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करावी. तसेच  महेंद्रीला संवर्धन राखीव घोषित करताना भविष्यात त्याचे अभयारण्यात रूपांतर करण्यापूर्वी लोकांना विश्वासात घेऊन, गावकऱ्यांशी चर्चा करून पुनर्वसनाचा कालबद्ध कार्यक्रम तयार करावा असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.जंगलावर लोकांचे अवलंबित्व कमी करण्यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून लोकांना रोजगार  निर्माण करून देण्यासाठी वन विभाग करत असलेल्या प्रयत्नासाठी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांचे  अभिनंदन केले. असेच प्रयत्न केल्यास वन किंवा अभयारण्याबद्दल  लोक अधिक सकारात्मक होऊन  संवर्धनात सहकार्य करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.


एकाच वेळी १ अभयारण्य व १० संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य  - संजय राठोड


         राज्यात एकाच वेळी १ अभयारण्य व १० संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता देण्याचा निर्णय हा ऐतिहासीक असून असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले  आहे.आणखी सुमारे एक हजार चौरस किलोमीटर क्षेत्र  हे संवर्धन राखीव झाले आहे व कन्हाळगाव हे राज्यातील ५० वे अभयारण्य झाले आहे असे वन मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.


लोणार सरोवरासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्राप्त होणाऱ्या निधीसाठी प्रस्ताव सादर करा


 -आदित्य ठाकरे


       लोणार सरोवराला नुकतेच रामसर साईट म्हणून घोषित करण्यात आले आहे.त्याच्या संवर्धन व संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय  स्तरावरून प्राप्त होणाऱ्या निधीसाठी प्रस्ताव सादर करावा असे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.अवनी वाघिणीच्या पिल्ल्याची संपूर्ण वाढ झाली असून या पिल्ल्याला पेंच येथील नैसर्गिक अधिवासात सोडण्यास एन. टी. सी. ए. ची मान्यता मिळाली आहे,नवीन ट्रान्झिट् ट्रीटमेंट सेंटर सुरू करण्यासाठी नाशिक व पुणे येथून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत,जुन्या ट्रान्झिट सेंटरला निधी देऊन सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती बैठकीत देण्यात आली. त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ इतरत्र  स्थलांतरित करण्यासाठी नियुक्त समितीचा अहवाल लवकरच शासनास सादर होईल असेही सांगण्यात आले. यावेळी वनमंत्री संजय राठोड, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे,आमदार तथा राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य धीरज देशमुख,प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर,अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (पश्चिम)सुनील  लिमये, वन संरक्षक तथा संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मल्लिकार्जुन रेड्डी,आदि यावेळी उपस्थित होते.तर   राज्य वन्यजीव मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.


   दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


 🙏 सावधानी बाळगा कोरोना पासून बचाव करा 🙏