जलयुक्त शिवार’च्या खुल्या चौकशीसाठी समिती गठीत 

जलयुक्त शिवार’च्या खुल्या चौकशीसाठी निवडावयाच्या कामांचा शोध घेण्याकरिता समिती गठीत 



मुंबई प्रतिनिधी : जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत झालेल्या कामांची खुली चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून फक्त कामांची संख्या अधिक असल्याने कोणती कामे खुल्या चौकशीसाठी निवडणे आवश्यक आहे याचा शोध घेण्यासाठी सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. सर्वांसाठी पाणी टंचाई मुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत टंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाची सुरुवात झाली. या अभियानाची मुदत  ३१ मार्च २०१९ पर्यंत होती. तदनंतर या अभियानास सन २०१८-१९ मध्ये निवडण्यात आलेल्या गावातील कामे पूर्ण करण्यासाठी दि. ३१ मार्च २०२० अखेर मुदतवाढ देण्यात आली होती. अभियान आता संपुष्टात आले आहे. अभियान विविध शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था, लोकसहभाग व खासगी उद्योजक (CSR) यांच्याकडील उपलब्ध निधीतून राबविण्यात आले. २०१५-१६ ते सन २०१८-१९ अंतर्गत निवडलेल्या गावांमध्ये सुमारे ६ लाखांच्या वर कामे करण्यात आली.


        भारताचे नियंत्रक व महालेखा परिक्षक यांचा  ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वर्षाचा सामान्य आणि सामाजिक क्षेत्र व सार्वजनिक उपक्रमावरील वर्ष २०२० चा अहवाल क्रमांक -३ मध्ये महालेखापाल यांनी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामांबाबत नोंदविलेल्या मुद्यांवर मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत झालेल्या कामांची खुली चौकशी करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे. कार्यरत अतिरिक्त पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंध विभाग, म.रा.,.संजय बेलसरे, मुख्य अभियंता जलसंपदा विभाग, कार्यरत संचालक, मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, पुणे हे या समितीतील सदस्य असतील. भारताचे नियंत्रक व लेखा परिक्षक यांच्या अहवालात नमूद ६ जिल्ह्यातील १२० गावांमध्ये तपासणी केलेल्या ११२८ कामांपैकी कोणत्या कामांची खुली चौकशी करणे आवश्यक आहे व कोणत्या कामांमध्ये केवळ प्रशासकीय कारवाई किंवा विभागीय चौकशी करणे आवश्यक आहे याची शिफारस समिती संबंधीत यंत्रणांना करणार आहे.


      जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१५ पासून प्राप्त झालेल्या तक्रारींचा तपशील क्षेत्रिय यंत्रणाकडून मागविण्यात आले होते. त्यानुसार साधारणत: ६०० च्या वर तक्रारीबाबतची माहिती प्राप्त झाली. तक्रारींची छाननी करुन त्यानुसार कोणत्या कामांची खुली चौकशी करणे आवश्यक आहे व कोणत्या कामांमध्ये केवळ प्रशासकीय कारवाई किंवा विभागीय चौकशी करणे आवश्यक आहे याची शिफारस संबंधीत यंत्रणांना करावी लागणार आहे. याशिवाय समितीने जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या व समितीला आवश्यक वाटेल त्या कोणत्या कामांची खुली चौकशी करणे आवश्यक आहे व कोणत्या कामांमध्ये केवळ प्रशासकीय कारवाई किंवा विभागीय चौकशी करणे आवश्यक आहे याची शिफारस संबंधीत यंत्रणांना करावी लागणार आहे. समितीने शिफारस केल्याप्रमाणे संबंधीत यंत्रणा त्या कामासंदर्भात खुली चौकशी अथवा प्रशासकीय कारवाई किंवा विभागीय चौकशी तात्काळ सुरु करणार आहे. समिती नेमून दिलेल्या कार्यकक्षेनुसार ६ महिन्यांमध्ये कामकाज पूर्ण करणार आहे. समिती दर महिन्याला शिफारशी केलेल्या सर्व प्रकरणांबाबत अहवाल शासनास सादर करणार आहे.


 दिगंबर वाघ  


 कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..