अनैतिक संबंधातून ११ दिवसांत ३ महिलांची हत्त्या

भिवंडीत विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनैतिक संबंधातून ११ दिवसांत ३ महिलांची हत्त्या तर एकीची आत्महत्या !

भिवंडी प्रतिनिधी अरुण पाटील : भिवंडी हे शहर यंत्रमाग नगरी व गोदामांचे शहर म्हणून ओळखले जात असून या शहरात रोज चोऱ्या, घरफोड्या, खून, या घटना घडत असतात. अश्यातच भिवंडी पोलीस उपयुक्तांच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्यात गेल्या ११ दिवसांत अनैतिक संबधातून ३ महिलांची हत्त्या तर एकीने आत्महत्त्या केल्याची घटना समोर आली आहे.या पैकी दोन प्रेयसी एक पत्नी तसेच आईचा समावेश मृत महिलांमध्ये आहे.

    पहिल्या घटनेतील मृत महिला पतीला सोडून उल्हासनगरमधील तिच्या ओळखीचा संतोष चौरसिया याच्या सोबत राहत असताना तिला कामाची गरज होती. त्यामुळे संतोषने तिला भिवंडीतील कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनाळे गावात राहणाऱ्या आरोपी राजकुमार पासवान याच्याकडे आणून सोडले. चार महिन्यांपूर्वीच त्यांची पत्नी मूळ गावी बिहारला निघून गेली होती. त्यानंतर मृत व आरोपीमध्ये सूत जुळून अनैतिक संबंध निर्माण झाले होते. त्यातच गेल्या चार महिन्यापासून दोघेही लग्न न करता एकत्र संभधात लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. मात्र त्यांच्यात काही कारणांवरून वारंवार वाद होत असल्याने मृत ममतादेवीने दोघातील अनैतिक संबंधाची माहिती पत्नीला व पोलिसांना देईन, अशी धमकी राजकुमारला देत होती. त्या कारणाने १३ सप्टेंबर रोजी रात्री पुन्हा त्यांच्यात वाद होऊन आरोपी राजकुमारने ममतादेवीचे डोके राहत्या घरात जमिनीवर आदळून तिची हत्त्या केली. त्यानंतर त्याच दिवशी तो दाराला कडी लावून फरार झाला.

   दुसरी घटना नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काल्हेर गावात घडली. यात एक मृत आई मृत आई ही काल्हेर गावातील एका इमारतीमध्ये कुटूंबासह राहत होती. तर आरोपी मुलगा कृष्णा हा अविवाहित असून त्याचे घटस्फोट झालेली चुलत बहिण बबिता सोबत मागील ३ वर्षांपासून अनैतिक संबंध होते. याची कुणकुण मृत आईला लागल्याने तिने कृष्णाच्या या अनैतिक संबंधास विरोध करीत होती. त्यामुळे पोटच्या मुलानेच आईची हत्त्या केली. 

        तिसरी घटना भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमान टेकडी येथे घडली.यात आरोपी सद्दाम आणि मृत कविता या दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याने दोघेही गेल्या ५ ते ६ वर्षांपासून भिवंडीतील हनुमान टेकडी परिसरात लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. तर मृत महिला रेडलाईट एरियात देह विक्रीचा व्यवसाय करत होती. २२ सप्टेंबर रोजी पहाटे ४ वाजताया दोघात भांडण होऊन वाद विकोपाला गेल्याने सद्दाम याने राहत्या घराच्या बेडरूममध्ये कविताचा गळा आवळून खून केला व गुन्हा लपवण्यासाठी त्याने कविताच्या नातेवाईकांनाही फ़ोनद्वारे सदर घटनेची माहिती कळवली व रुग्णवाहिकेतून मृतदेह विजापूर (कर्नाटक) नेऊन विल्हेवाट लावल्याचा प्लॅन रचला होता. पण तो फसला गेला. पोलिसांनी अटक करून सद्दाम याच्यावर भादवि कलम ३०२, २०१ अन्वये शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

     चौथी घटना भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोंबडं पाडा येथे घडली असून यात पतीच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे. रेणूका सुनिलकुमार थालोर (२४) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पत्नीचे नाव आहे. येथील सोमेश्वर अपार्टमेंटमध्ये तिच्या पतीसोबत राहत होती.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८