तेलंगणाच्या कृषीमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या कृषी योजनांचे कौतुक

तेलंगणाच्या कृषीमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या कृषी योजनांचे कौतुक



मुंबई प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन विविध योजना राबवित असून या क्षेत्रात तेलंगणा राज्याच्या कृषी विभागाच्या अभिनव योजनांचा अभ्यास केला जाईल, असे राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. तेलंगणाचे कृषीमंत्री  एस. निरंजन रेड्डी  यांनी बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याचे कृषीमंत्री  भुसे यांची भेट घेतली. महाराष्ट्र फळबाग लागवडीत देशात प्रथम क्रमांकावर असून त्या बाबतीत महाराष्ट्राकडून मार्गदर्शन घेण्यासाठी विशेष भेटीवर आल्याचे तेलंगणाचे कृषीमंत्री एस. निरंजन रेड्डी यांनी यावेळी सांगितले.


     फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, तेलंगणाच्या पणन संचालक लक्ष्मी यावेळी उपस्थित होते. कृषी क्षेत्रात महाराष्ट्राकडून शिकण्यासारखे खूप असून महाराष्ट्र दौरा त्यासाठी लाभदायी ठरेल, असे  रेड्डी यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘विकेल ते पिकेल’ या अभियानाचे विशेष कौतुक  रेड्डी यांनी केले. यावेळी त्यांनी तेलंगणा राज्यात शेतकऱ्यांसाठी राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. राज्याचे कृषी सचिव  डवले यांनी सादरीकरणादरम्यान विविध कृषी योजनांची माहिती दिली.


 दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..