बंजारा समाजाच्या विकासासाठी वनार्टी व नंगारा बोर्ड स्थापणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वाशिम ‍प्रतिनिधी : बंजारा समाजाच्या विकासासाठी शासन सदैव सकारात्मक आहे. कुणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता शासन घेईल. बंजारा समाजाच्या विकासासाठी ‘वनार्टी’  (वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था) तसेच ‘नंगारा बोर्ड’ स्थापन करुन त्यासाठी 50 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोहरादेवी येथे केली.बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत सेवालाल महाराज यांच्या पंचधातू्च्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण, सेवाध्वजाचे आरोहण व 593 कोटी रुपयांच्या विकासकामांचे भुमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते.

    या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड ग्रामविकास मंत्री गिरिश महाजन, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, महंत बाबुसिंग महाराज खासदार भावना गवळी खासदार प्रतापराव जाधव उमेश जाधव आमदार ॲड. किरण सरनाईक राजेंद्र पाटणी संतोष बांगर इंद्रनील नाईक संजय रायमुलकर निलय नाईक विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत पोहरादेवीचे सरपंच विनोद राठोड आदी उपस्थित होते.यावेळी पारंपरिक बंजारा पद्धतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच उपस्थित लोकप्रतिनिधींच्या हस्ते पोहरादेवी व उमरी येथील 593 कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात येणा-या विकासकामांच्या भुमिपूजन कोनशिलेचे अनावरण झाले.मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाची सुरूवात गोर बंजारा बोलीत करून उपस्थितांची मने जिंकून घेतली. ते म्हणाले की, पोहरादेवी येथे आल्यावर काशीला आल्यासारखे वाटले. बंजारा समाज हा निसर्गपूजक आणि लढवय्या आहे. बंजारा समाजाच्या विकासासाठी नंगारा प्राधिकरण स्थापण्यासाठी शासनाने मान्यता दिली असून त्यासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. तसेच वसंतराव नाईक महामंडळालाही निधी कमी पडू देणार नाही. तांडा सुधार योजनेत प्रत्येक तांड्यावर पाणी रस्ते इत्यादी मूलभूत सुविधा विकासासह शाळा दवाखाने, अंगणवाडी यासारख्या सुविधाही उपलब्ध करून देऊ असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

   मुख्यमंत्री  शिंदे म्हणाले की विकासासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल. नवी मुंबई येथे बंजारा समाज भवन स्थापन करण्यासाठी प्रयत्न करू. समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच शासन सकारात्मक आहे अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

पोहरादेवीचा कायापालट करु  -उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गोर बंजारा बोलीत भाषणाची सुरुवात करून उपस्थितांची मने जिंकली. ते म्हणाले की, बंजारा समाजाची काशी असलेल्या या स्थळाचा कायापालट करण्यासाठी शासन निधी कमी पडू देणार नाही. ज्याप्रमाणे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काशीचा कायापालट केला. त्याप्रमाणे बंजारा समाजाच्या काशीचा अर्थात पोहरादेवी तीर्थस्थळाचा कायापालट करू असे ते म्हणाले.उपमुख्यमंत्री फडणवीस  म्हणाले संत सेवालाल महाराज यांनी दिलेल्या प्रतिज्ञा या केवळ बंजारा समाजासाठी नव्हे तर समस्त मानवतेच्या कल्याणासाठी आहेत. बंजारा हा एक प्राचीन समाज आहे. बंजारा समाजातील महापुरुषांनी त्याग आणि समर्पणाची मोठी परंपरा निर्माण केली आहे. एकेकाळी समृद्ध असणाऱ्या या गोपालक समाजाची आजची हलाखीची स्थिती सुधारण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल असे त्यांनी उपस्थितांना आश्वस्त केले.

    उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की तांड्यांचा विकास करण्यासाठी आराखडा तयार करून प्रत्येक तांड्यापर्यंत विकास पोहोचवू. बंजारा समाजातील मुला-मुलींचे शिक्षण थांबू नये यासाठी शासन उपाययोजना करेल. ‘नॉन क्रिमिलेयर’ ची अट रद्द करण्याबाबत महाधिवक्त्यांचे मत मागविण्यात येईल. पोहरादेवीचा विकास करण्यासाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही. गोर बोलीचे संवर्धन करण्यासाठी अकादमी स्थापन करू. शासन संत सेवालाल महाराज यांचे कार्य पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहे असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पालकमंत्री संजय राठोड यांनी बंजारा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली.या कार्यक्रमात उपस्थित बंजारा बांधवांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविले.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८