औद्योगिक क्षेत्रांतील निर्मुलनासाठी यंत्रणांनी प्रभावी कामगीरी करावी

पालघर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील प्रदुषण निर्मुलनासाठी यंत्रणांनी प्रभावी कामगीरी करावी


- पालकमंत्री दादाजी भुसे 



मुंबई प्रतिनिधी : बोईसर, तारापूर औद्योगिक क्षेत्रांतील प्रदुषण आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून प्रभावी कामगीरी करावी. येत्या महिन्याभरात प्रदूषण पातळीत कमालीची घट आणण्याकरीता प्रयत्न करावेत, असे निर्देश पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिले. पालघर जिल्हा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या  बोईसर, वसई, तारापूर या औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या विविध अडचणी, प्रदूषण, अपघात, सांडपाणी प्रक्रीया केंद्र या संदर्भात आढावा घेण्यासाठी पालकमंत्री  भुसे यांनी मंत्रालयात बैठक घेतली त्यावेळी ते बोलतहोते.           


      यावेळी पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ, कामगार उपायुक्त औद्योगिक सुरक्षा मंडळाचे अधिकारी,पालघरचे उपविभागीय अधिकारी डी.एस.नेरकर आदींसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी आदी उपस्थित होते. भुसे यावेळी म्हणाले, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे रोजगाराला प्राधान्य देण्यात आले.त्यामुळे या औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांच्या सुरक्षिततेबरोबर निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी तात्काळ प्रयत्न करणे आवश्यक आहे. यापूर्वी या औद्योगिक वसाहतीमध्ये झालेल्या दुर्घटनांना जे विभाग जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत. यासाठी गांभीर्याने काम करा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.           


     जे कारखाने प्रदुषण नियंत्रणाचे निकष पाळणार नाही त्याच्यावर कारवाई करा. पुढील महिन्यापर्यंत या संदर्भात प्रभावी कारवाई करतांनाच या औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदुषण कमी होण्याकरिता वृक्षारोपणाची मोहिम हाती घेण्याची सूचना देखील भुसे यांनी यावेळी केली.


दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..