सोसायटी मध्ये गटबाजी झाल्यास होणारे परिणाम...

संस्थेच्या समिती सदस्यांचा कार्यकाल/गणपूर्ती याबाबत... 

                   भाग १२ 

ॲड. विशाल लांजेकर यांच्या लेखणीतून सोप्या भाषेत प्रश्न उत्तरे 

    दर आठवडयाला,दर सोमवारी...

        गृहनिर्माण संस्थेच्या कामात गटबाजी असता कामा नये. सदस्यांना आपल्या संस्थेबाबत प्रेम असणे गरजेचे आहे. तरच संस्था चांगल्या प्रकारे चालविण्यास मदत होते. अन्यथा काही वर्षातच संस्था ही त्रयस्थ व्यक्ती म्हणजेच “प्राधिकृत व्यक्ती” यांची नियुक्ती करावी लागते. परंतु कालांतराने सदस्यांना झालेली चूक समजते. तोपर्यत बराच उशीर झालेला असतो आणि त्यात आपल्याला काही कळत नाही, तर योग्य व्यक्तीला विचारून त्याच्या सल्ल्याने काही कराव, हे सुद्धा बहुसंख्य लोकांना सांगायची तीव्र गरज निर्माण झाली आहे. बऱ्याचदा असे निदर्शनास येते की, उपविधीत सुधारणा करताना  क्रमांकामध्ये नजरचुकीने चुका राहून जातात. त्यामुळे पुढील सर्व उपविधी क्रमांक हे बदलतात. या चुका दुरुस्त केलेले उपविधीचे ई-बुक खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे https://amzn.to/2Td3SzM 

        आजच्या सत्रात अश्याच काही महत्वाच्या गोष्टीवर प्रकाश टाकणारा लेख आपल्यासाठी. आपल्या प्रतिक्रीया मला खालील इमेल वर कळवाव्यात.      

प्रश्न क्र.५८) निवडून आलेल्या समितीचा पदावधी किती वर्षाचा असतो ?

उत्तर:  उपविधी क्र.११५(अ) अन्वये निवडून आलेल्या समितीच्या पदावधी व्यवस्थापन हाती घेतल्याच्या दिनांकापासून पाच वर्षे इतका राहील.

प्रश्न क्र. ५९) समितीतील सदस्यांची संख्या किती असावी? सदस्य संख्येनुसार ती किती असावी ?

उत्तर:  समितीतील सदस्यांची संख्या ११/१३/१५/१७ आणि १९ अशा प्रकारे असेल व या संख्येमध्ये अधिनियमातील कलम ७३ब व ७३क अन्वये तरतूद केल्याप्रमाणे आरक्षित सदस्य संख्येचा समावेश असेल.

टीप: समितीतील सदस्यांची संख्या आणि सभा घेण्यासाठी आवश्यक गणपूर्ती (कोरम) खालीलप्रमाणे आवश्यक राहील.

प्रश्न क्र.६०) नव्याने निवडून आलेल्या समितीची पहिली सभा केव्हा आणि कश्याप्रकारे बोलावण्यात येते आणि जर सभा बोलावण्यात कसूर झाल्यास ती सभा कोण आयोजित करू शकेल ?

उत्तर:  अधिनियमातील कलम ७३ अअअ व उपविधी क्र.११८ अनुसार नवीन समिती स्थापन झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत नव्याने निवडून आलेल्या व मावळत्या समितीची पहिली सभा घेण्यात येईल. उपविधी क्र.१२२(अ) च्या तरतुदींच्या अधीन राहून मावळत्या समितीचा सचिव नव्याने निवडून आलेल्या समितीच्या सदस्यांना व मावळत्या समितीच्या सदस्यांना पहिल्या सभेची नोटीस पाठवील. मावळत्या समितीच्या सचिवाने संयुक्त सभा आयोजित केली नसेल तर मावळत्या समितीच्या अध्यक्ष अशी सभा आयोजित करील. दोघांनीही ही सभा आयोजित केली नसेल तर नोंदणी प्राधिकारी अशी सभा आयोजित करू शकेल.

प्रश्न क्र. ६१) एखाद्या विषयात हितसंबंध असलेल्या समितीच्या सदस्याने असा विषय विचारार्थ पुढे आला असताना सभेत उपस्थित राहण्यावर व मतदान करण्यावर काय निर्बंध आहेत ?

उत्तर:  ज्या विषयात एखाद्या समिती सदस्यांचे हितसंबंध, प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे गुंतलेले आहेत असा विषय समितीपुढे विचारार्थ आला असताना त्या सदस्याने त्यावेळी सभेत हजर राहता कामा नये.

प्रश्न क्र. ६२) संस्थेचा अभिलेख कोणाच्या ताब्यात असतो? कार्यभार कशा प्रकारे नविन समितीकडे सुपूर्द केला जातो ?

उत्तर:  संस्थेचा अभिलेख संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या संमतीने संस्थेच्या वास्तूमध्ये सचिवास सोईस्कर होईल, अशा ठिकाणी ठेवण्यात येईल व सभासदांना त्याबाबत कळविण्यात येईल. जेव्हा नवीन समिती निवडून येईल तेव्हा मावळत्या समितीचा सचिव त्याच्या ताब्यात असलेली संस्थेची कागदपत्रे व मालमत्ता यांची सूची तयार करील व आपला कार्यभार मावळत्या अध्यक्षाच्या हाती सुपूर्द करील. निवृत्त होणार अध्यक्ष समितीच्या पदाचा कार्यभार व त्याच्या ताब्यात असलेली संस्थेची कागदपत्रे व मालमत्ता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० च्या कलम१६० मध्ये अंतर्भूत केलेल्या तरतुदीनुसार नवीन समितीच्या अध्यक्षाकडे सुपूर्द करील.

प्रश्न क्र. ६३) समितीच्या सभेसाठी गणपूर्ती किती असावी ? समितीने महिन्यात किती सभा घ्याव्यात ?

उत्तर:  समितीची सभा सर्वसाधारणपणे संस्थेच्या जागेमध्ये भरवण्यात येईल. उपविधी क्र.११४ मध्ये नमूद केल्याप्रमाणे समितीच्या सभेसाठी गणपूर्ती असेल. समितीच्या सभेच्या कार्यसूचीवरील प्रत्येक बाब विचारार्थ मांडताना गणपूर्ती नसेल तर कोणतेही कामकाज करण्यासाठी समिती सक्षम असणार नाही. समितीची सभा आवश्यक असेल त्याप्रमाणे भरेल. परंतु महिन्यातून ती किमान एकदा भरलीच पाहिजे.

मागील लेखाबाबत अथवा आपल्या प्रश्नाबाबत अधिक माहितीसाठी खालील इमेलवर संपर्क साधू शकता.

vishal@vlawsolutions.com

(ॲड. व्ही लॉ सोल्युशनस चे संस्थापक आहेत)

दिगंबर वाघ             

    कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८ 


      🙏  एक वचन तीन नियम  🙏

 १) मास्क वापरा २) हात धुवा ३) अंतर ठेवा