राज्यपालांच्या हस्ते स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

विशाखा सुभेदार, उर्वशी रौतेला, निशिगंधा वाड, कविता राऊत, पलक मुच्छल सन्मानित

मुंबई प्रतिनिधी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते अभिनेत्री विशाखा सुभेदार, उर्वशी रौतेला व निशिगंधा वाड, धावपटू कविता राऊत, पार्श्व गायिका पलक मुच्‍छल यांसह 11 गुणवंत महिलांना राजभवन येथे स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुणे येथील सुर्यदत्त समुह शिक्षण संस्थेतर्फे राजभवन येथे आयोजित एका कार्यक्रमात सुर्यदत्त स्त्री शक्ती पुरस्कार देण्यात आले. मातृत्व म्हणजे केवळ आई होऊन बाळाला जन्म देणे नाही, तर मातृत्व म्हणजे सहनशीलता, प्रेम व कारुण्यभाव असे सांगताना स्त्रीशक्ती अद्भूत असल्याचे राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितले. मनुष्य कितीही यशस्वी झाला, संपन्न झाला व यशवंत झाला तरीही सुख-दुःख प्रसंगी त्याला आईचीच आठवण येते, असे सांगून माता, मातृभाषा व मातृभूमीचे स्मरण ठेवल्यास प्रत्येकाला आपापल्या क्षेत्रात अधिक प्रगती करता येईल, असे राज्यपालांनी सांगितले. 

  यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सिस्टर ल्युसी कुरियन, डॉ स्वाती लोढा, आरती देव, ॲड. वैशाली भागवत, तृशाली जाधव तसेच सुर्यादत्ता समूहाच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांना देखील सुर्यदत्त स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुर्यदत्त संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय चौरडिया यांनी प्रास्ताविक केले. डॉ निशिगंधा वाड, विशाखा सुभेदार व  वैशाली भागवत यांनी सत्काराला उत्तर दिले. पलक मुच्छल यांनी गीत सादर केले तर उर्वशी रौतेला यांनी गढवाली गाणे गायले.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८