किल्ले शिवनेरी येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

गडकोट किल्ले आपला ठेवा तो जपण्याचे काम करू-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे  प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले आपला ठेवा असून तो जपण्याचा प्रयत्न नक्की करू.पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराजांशी संबंधित विविध २० पर्यटनस्थळे विकसित होत आहेत त्यात किल्ले रायगडप्रमाणेच शिवनेरीचाही विकास करण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप-वळसे पाटील खासदार डॉ.अमोल कोल्हे आमदार अतुल बेनके माजी खासदार तथा म्हाडाचे पुणे गृहनिर्माण मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील माजी आमदार शरद सोनवणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्रीमती आशाताई बुचके जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे मुख्य वनसंरक्षक एन. आर.प्रवीण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख उपवनसंरक्षक अमोल सातपुते, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे आदी उपस्थित होते.

  मुख्यमंत्री शिंदे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तुकला अभियांत्रिकी किल्ल्यावरील प्रत्येक थेंब पाण्याचा उपयोग करून घेण्याची दूरदृष्टी दाखवली.शिवछत्रपती म्हणजे पराक्रम शौर्य त्याग समर्पण आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते.ते सर्वव्यापी होते आणि त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केले.ते युगपुरुष युगप्रवर्तक आणि रयतेचे राजे होते.त्यांनी अठरापगड जातीचे धर्मांचे लोक एकत्र आणले.प्रजेच्या दुःखापुढे कल्याणापुढे स्वतःचे दुःख आराम कवडीमोल मानला.ते केवळ व्यक्ती नाही तर विचार होते. शिवरायांकडील एक तरी गुण आपण घेतला तर शिवजयंती साजरी करताना त्यांना खरे अभिवादन ठरेल.त्यामुळे समाज राज्य देश आणि माणूस म्हणून आपण अधिक प्रगती करू.

  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील नौदलाच्या कार्यक्रमात शिवछत्रपती यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले.नौदलाच्या ध्वजावर शिवप्रतिमेला समाविष्ट केले ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. कुपवाडा येथे भारत पाकिस्तान सीमेवर लष्करी जवानांनी शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे.आग्य्राला देखील दिवाण-ए-आम येथे शिवाजी महाराजांची जयंती गतवर्षीपासून साजरी करीत आहोत.छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रधानमंत्री यांनी शिफारस केली आहे.ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.जुन्नर पर्यटन तालुका असून बिबट सफारी विकसित करण्याचे घोषित केले आहे.येथील सुकाळवेढे, बोरघर, डूचकेवाडी, खेतेपठारमार्गे शिवजन्मभूमी आणि भीमाशंकर तीर्थक्षेत्रे जोडण्याचा प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले.

निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना नुकसान भरपाईची घोषणा

निसर्ग चक्रीवादळामुळे हिरडा पिकाचे झालेल्या नुकसान भरपाईचे १५ कोटी रुपये विशेष बाब म्हणून देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करतानाच उपोषणकर्त्यांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मंगळवारी विशेष अधिवेशन

  इतर कुणाचेही नुकसान न करता कुठल्याही समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे आरक्षण देण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन उद्या घेण्यात येणार आहे. ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यभरात शिवाजी महाराजांच्या कार्यावर कार्यक्रम घेतले आहेत.जाणता राजा महानाट्याचे कार्यक्रम जिल्हावार घेत आहोत असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

किल्ल्यांच्या विकासाकरिता एएसआयचे नियम शिथिल करण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक -देवेंद्र फडणवीस

  राज्यातील किल्ल्याचे संवर्धन करीत असताना भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून (एएसआय) येणाऱ्या अडचणीबाबत केंद्र सरकारकडून पाठपुरावा करून बैठक आयोजित करण्यात आली.त्यामध्ये पुरातत्व खात्याची प्रमाणित कार्यपद्धती सुलभ करण्याबाबत आश्वासन देण्यात आले.ही प्रक्रिया सुलभ झाल्यानंतर किल्ले संवर्धन कामाला गती येईल.  छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे असे उपमख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

  छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊनच शासन काम करत आहे. जोपर्यंत चंद-सूर्य आहे तोपर्यंत शिवाजी महाराज यांचा जयजयकार भारत भूमीत होतच राहील.शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवाजी महाराज यांचे विचार चरित्र लहान बालकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करण्यात येत आहे. प्रत्येक विभागीय मुख्यालयी शिवसृष्टी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.परिणामी पुढील पिढीमध्ये त्यांचे तेज बघायला मिळेल असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.माँ जिजाऊ यांच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी समाजात हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याच्या मूलमंत्राचे रोपण केले. समाजातील अतिशय सामान्य व्यक्ती आणि अठरा पगड जातीला एकत्र करून त्यामधील पुरुषत्व जागृत केले.शिवरायांनी अन्यायाच्या विरुद्ध संघर्ष करण्याची शिकवण दिली असेही त्यांनी सांगितले.

किल्ल्याच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही-उपमुख्यमंत्री अजित पवार

  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आदर्श इतिहास सर्वांच्या डोळ्यासमोर राहावा यासाठी राज्यातील विविध किल्ले संवर्धनाचे काम राज्य शासनाने हाती घेतले आहे.किल्ले शिवनेरी यांच्या संवर्धनासाठी ८३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे.किल्याच्या संवर्धनासाठी राज्य शासन निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.

  छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करीत आहोत.शिवाजी महाराजांनी ३५० वर्षांपूर्वी रायगड किल्यावर स्वतःचा राज्यभिषेक करून अखंड हिंदुस्थानसोबत युरोपातील राज्यसत्ताना अचंबित केले.हा शिवराज्याभिषेक सोहळा राज्यभरात विविध कार्यक्रमांनी साजरा करत आहोत.त्यांचा सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा एकतेचा विचार नवीन पिढीला कळण्याचा निर्धार या जयंतीनिमित्त करुया. सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यातील सर्व जातीधर्माच्या नागरिकामध्ये गुलामगिरीच्या विरुद्ध झुंजण्याचा विचार त्याकाळात शिवरायांनी पेरला.परकीय सत्तेसमोर सार्वभौमत्व स्वराज्याची स्थापन करत रयतेला आपले वाटावं असे राज्य स्वराज्य त्यांनी स्थापन केले याची प्रेरणा राज्य शासन घेऊन काम करीत आहे असेही ते म्हणाले.

  जून २०२० मध्ये निसर्ग चक्रीवादळाने हिरडा पिकाचे नुकसान झालेल्या जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना १५ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी सूचना केली.प्रारंभी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारे पाळणा गीत गायले. राष्ट्रगीत तसेच 'गर्जा महाराष्ट्र माझा' या राज्यगीताची धून पोलीस बँड पथकाने वाजवून सलामी दिली.त्यानंतर पोलीस पथकाने छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली.यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या बाल पथकाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंग सुंदर पद्धतीने सादर केला.त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बालशिवाजी व माँ जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहिली.

  कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते किल्ले शिवनेरी विकास मंडळाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.दिलीप भुजबळ यांना प्रदान करण्यात आला. शिवनेरी भूषण पुरस्कार कारगिल युद्धात विशेष कामगिरी बजावलेल्या निवृत्त ब्रिगेडियर अनिल काकडे आणि अंटार्क्टिका मोहिमेचे नेतृत्व केलेले डॉ.अरुण रामचंद्र साबळे यांना प्रदान करण्यात आला.विजय घोगरे यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमास प्रांताधिकारी गोविंद शिंदे मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मुळे यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.

शिवाई देवराई आणि वन उद्यानाचे लोकार्पण

  मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पवार यांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरी येथे शिवाई देवराई आणि वन उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले.शिवनेरी संवर्धन आणि विकास प्रकल्पांतर्गत वन विभागाच्यावतीने किल्ले शिवनेरीवर अडीच एकर क्षेत्रावर तीन वनोद्यान व स्वतंत्र शिवाई देवराई विकसित करण्यात आली आहे.देवराईची संकल्पना सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेची असून संस्थेच्या माध्यमातून जैन इरिगेशनच्या सामाजिक दायित्व निधीतून सूक्ष्म आणि ठिबक सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.त्यामुळे शिवनेरी गडावरील प्रत्येक थेंबाचा शाश्वत वापर होणार आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८