लॉकडाऊनच्या काळात ४७८ गुन्हे दाखल २५८ लोकांना अटक

लॉकडाऊनच्या काळात ४७८ गुन्हे दाखल २५८ लोकांना अटक



महाराष्ट्र सायबर विभाग जळगावात नवीन गुन्हा


मुंबई प्रतिनिधी : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पाऊले उचलली आहेत.  राज्यात सायबर संदर्भात ४७८  गुन्हे दाखल झाले असून २५८ व्यक्तींना अटक केली आहे. अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे. राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ४७८ गुन्ह्यांची (ज्यापैकी ३२ N.C आहेत) नोंद १४ जून २०२० पर्यंत झाली आहे. त्याची प्रामुख्याने जिल्ह्यानुसार आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.


२५८ आरोपींना अटक


             या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १९५ गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १९५  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, tiktok विडिओ शेअर प्रकरणी २४ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी  ९ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा     (ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ५१ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत  २५८ आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे. 


            जळगाव जिल्ह्यातील फैजपूर पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे त्यामुळे जिल्ह्यातील नोंदणीकृत गुन्ह्यांची संख्या ३४ वर गेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीने स्वतः कोरोनाग्रस्त रुग्ण आहोत आणि सरकार कोरोनाग्रस्त रुग्णांची काळजी घेत नाही व त्याला जातीयवादाचा रंग देणाऱ्या  आशयाचा मजकूर असणारा विडिओ बनवून तो सोशल मिडियावर प्रसारित केला. त्यामुळे परिसरातील शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.   


matrimonial वेबसाईट सावधानता बाळगा


            सध्याच्या काळात बऱ्याच उपवर मुलं /मुलींचे पालक आपल्या पाल्याच्या लग्नासाठी योग्य जोडीदार निवडायच्या कारणाने अनेक ऑनलाईन matrimonial वेबसाईटवर नोंदणी करतात, तसेच बऱ्याच विवाह जमविणाऱ्या संस्थांनी पण आता स्वतःच्या वेबसाईट सुरु केल्या आहेत ज्यावर ते सर्व उपवर मुले व मुलींच्या पालकांना नोंदणी करण्यास सांगत आहेत. बऱ्याचदा पालक किंवा मुलगा /मुलगी स्वतः या वेबसाईटवर  प्रोफाईल बनवून त्यात आपली माहिती , परिवाराची माहिती व फोटोज अपलोड करत आहेत. अशा वेबसाईट या सायबर भामट्यांकरिता या लोकांची ऑनलाईन आर्थिक फसवुणूक करण्यासाठी किंवा हा सर्व डेटा डार्कनेटवर किंवा इंटरनेटच्या काळाबाजारात विकण्यास एक्दम सोपे असे target आहे. 


अशा matrimonial वेबसाईटद्वारे ऑनलाईन फसविले जाणाऱ्यांची संख्या देखील बऱ्याच प्रमाणात आहे. दुर्दैवाने या मध्ये फसविले गेलेल्यांमध्ये मुलींची संख्या ही मुलांच्या तुलनेने  जास्त आहे. या फसवुणुकीचे अनेक प्रकार आहेत 


१) जेव्हा अशा प्रोफाईल बनविल्या जातात तेव्हा काही दिवसातच तुम्हाला प्रोफाईल match झाल्याचे notification येते ,यात बऱ्याचदा match झालेली प्रोफाईल ही कोणत्यातरी परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकाची असते. (आपल्याकडे परदेशात राहणाऱ्या भारतीयांबद्दल विशेषतः उपवर मुलींच्या पालकांच्या मनात सुप्त आकर्षण असते त्यामुळे सायबर भामटे मुख्यतः अशाच प्रोफाईल चा आधार घेतात). हळू हळू संवाद वाढतात, ओळख वाढते व समोरील व्यक्ती कालांतराने आपल्या बोलण्याने मोहित करते. ते कधी ऑनलाईन बोलतात फार आग्रह केलातरच कॅमेरा वर विडिओ कॉल होतो. मग एकेदिवशी हि व्यक्ती तुम्हाला सांगते कि ते परदेशातून तुम्हाला काही महागडी भेट वस्तू पाठवत आहेत. नंतर फोन येतो कि तुमच्या नावाने एक पार्सल आले आहे व custom clearance करिता अडकले आहे त्यामुळे एका ठराविक अकाउंट मध्ये ऑनलाईन ठराविक रक्कम भरावी कि २ दिवसात तुमचे पार्सल तुम्हास मिळेल. पैसे अकाउंटमध्ये भरले कि ना पार्सल येते तो नंबरपण बंद होतो व तसेच तुम्ही ज्या प्रोफाईलवरील व्यक्तीशी बोलणे चालू होते ती प्रोफाईल व सोशल मिडिया अकाउंट अचानक deactivate होते . 


२) या प्रकारात वरील प्रमाणेच ओळख होते व दोन्ही बाजूला संभाषण प्रकार क्रमांक १ मध्ये नमूद केल्याप्रमाणे सुरु होते ,संभाषणात एकमेकांदबद्दल जवळीक निर्माण होऊन अनेक वयक्तिकव खाजगी  फोटोज व माहिती शेअर केली जाते. हळू हळू समोरची व्यक्ती मग तुम्हाला black mail करण्यास सुरु करते कि अमुक अमुक रक्कम तुम्ही न दिल्यास तुमचे फोटोज व माहिती सोशल मिडिया वर प्रसारित केली जाईल. 


३)  या प्रकारात वरील प्रमाणेच ओळख होते व दोन्ही बाजूला संभाषण प्रकार क्रमांक १ मध्ये नमूद केल्याप्रमाणे सुरु होते, पण या प्रकारात मुख्यतः फसविली जाणारी व्यक्ती या  एकतर घटस्फोटित ,किंवा ज्यांचे जोडीदार जग सोडून गेलेत, किंवा ज्यांचीलग्न काही कारणाने होऊ शकले नाहीत अशा व्यक्ती असतात त्यातपण महिलांची संख्या अधिक आहे. संभाषण सुरु झाल्यावर प्रकार क्रमांक १ प्रमाणेच समोरील व्यक्ती कधी तुम्हाला महागडी भेट वस्तू अडकली आहे या कारणाने, तर कधी आपण आर्थिक विवंचनेत आहोत असे भासवून काही रक्कम घेते व नंतर गायब होते. 


महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते कि आपण जर या अशा matrimonial वेबसाईटचा वापर करत असाल तर सावध राहा . प्रोफाईल बनविताना आपली सर्वच माहिती त्यात देऊ नका तसेच फक्त एखाद दुसरा फोटोच अपलोड करा. प्रत्यक्ष मुलाचा किंवा मुलीचा मोबाईल क्रमांक देऊ नका घरातील कोणत्यातरी वयाने मोठ्या  व्यक्तीचा मोबाईल क्रमांक contact नंबर करून द्या . तसेच परदेशातील भारतीय प्रोफाईल ने match केले म्हणून हुरळून जाऊ नका उलट अशा स्थळाची अजून सखोल चौकशी करा. कोणत्याही परिस्थितीमध्ये अगदी समोरची व्यक्ती खरी आहे याची तुम्हाला खात्री झाली तरीदेखील आपली सर्व वैयक्तिक माहिती व खाजगी फोटोज शेअर करू नका. तसेच जर अशी व्यक्ती तुमच्याकडे काही आर्थिक मदत मागत असेल तर वेळीच सावध राहा. ज्या व्यक्ती विशेष करून महिला ज्या पुनर्विवाह करण्यास ईच्छूक  आहेत, त्यांनी तर जास्त सावध राहणे गरजेचे आहे. सायबर भामटे अशाच व्यक्तींना विशेषतः महिलांना आपले लक्ष करत असतात


         दिगंबर वाघ
      कार्यकारी संपादक ९४०४४५३५८८


 


            घरी राहा, सुरक्षित राहा 
           प्रशासनाला सहकार्य करा...