महिला व बालकांवरील अत्याचारांना लगाम

महिला व बालकांवरील अत्याचारांना लगाम घालण्यासाठी नियोजनबद्ध काम करणार


- ॲड. यशोमती ठाकूर 



मुंबई प्रतिनिधी : महिला व बालकांवर अत्याचार करणाऱ्या विकृत मनोवृत्तीला लगाम घालून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी महिला व बालविकास विभाग नियोजनबद्धरित्या काम करेल, अशी ग्वाही महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी दिली. बालदिनानिमित्त महिला व बालविकास विभाग आणि युनिसेफच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात कोविड काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल कोविड योद्ध्यांच्या सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. महिला व बालविकास विभागाच्या सचिव आय. ए. कुंदन, आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद, युनिसेफच्या बालसंरक्षण तज्ज्ञ अल्पा वोरा, मॅक्सवुमनच्या संपादक प्रियदर्शनी हिंगे व्यासपीठावर उपस्थित होत्या.


       महिलांच्या कल्याणासाठी खूप काम करणे आवश्यक असून महिला धोरणाची प्रभावी अंमलबजावणी येत्या काळात करायची आहे, असे सांगून ॲड. ठाकूर म्हणाल्या की, महिला, बालके तसेच तृतीयपंथीयांच्या मागे ज्याप्रमाणे शासन उभे आहे त्याचप्रमाणे समाजानेही उभे राहिले पाहिजे. अत्याचारग्रस्त बालके आणि महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलणे गरजेचे आहे. बाल लैगिंक शोषण तसेच महिलांवर अत्याचार करणाऱ्या विकृत मनोवृत्तीला लगाम घालायचा असेल तर तो गप्प बसून सहन न करता त्याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे. अशा घटकांना बोलण्यासाठी प्रवृत्त करणे तसेच त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विभागाकडून आगामी काळात नियोजनबद्धरित्या काम केले जाईल, असेही ॲड.ठाकूर म्हणाल्या.कोविड काळामध्ये माता- बाल पोषण, बालविवाह प्रतिबंध, आरोग्य आदी क्षेत्रामध्ये केलेल्या कामाबद्दल तुम्हाला ‘हॅट्स ऑफ’ असे म्हणत ॲड. ठाकूर यांनी यावेळी पुरस्कारार्थींबद्दल गौरवोद्गार काढले. अंगणवाडी सेविकांनी माता- बालकांना पोषण आहार पोहोचविण्यासाठी मोठे काम केले असेही त्या म्हणाल्या. सक्षम महिला, सदृढ बालक आणि सुपोषित महाराष्ट्र ही जन चळवळ गतीमान करण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.


     सचिव कुंदन म्हणाल्या की, बालकांचे कायदेशीर संरक्षण तसेच मानसिक, शारीरिक तंदुरुस्ती साधणे हे महिला व बालविकास विभागाचे प्राथमिक ध्येय्य आहे. पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि नियोजनबद्ध व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब गरजेचा असून विभागाने त्यादृष्टीने काम सुरू केले आहे. त्यानुसारच ‘जेजेआयएस’ मोड्यूल विकसित करण्यात आले आहे. बालकांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी महत्त्वाच्या ठरु शकणाऱ्या ग्राम बालसंरक्षण समित्या (व्हीसीपीसी) बळकट करण्याकडे विभाग गांभिर्याने लक्ष देत आहे, असेही कुंदन यांनी सांगितले.डॉ. यशोद यांनी सांगितले की, महिला व बालकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने काम करत असताना विविध यंत्रणांशी समन्वयाचे काम आव्हानात्मक असते. त्यासाठी विभागाकडून तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग केला जाईल.


      ज्युवेनाईल जस्टीस बोर्डसाठी विकसित करण्यात आलेले ज्युवेनाईल जस्टीस इन्फॉर्मेशन सिस्टीम (जेजेआयएस) मोड्यूल विधीसंघर्षग्रस्त बालकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विधीसंघर्षग्रस्त बालकांना बाल न्याय मंडळासमोर सादर करणे, त्यांना समुपदेशन, पुनर्वसन, आवश्यक मदत आदींच्या अनुषंगाने कार्यवाही, पोलिसांकडे अर्ज पाठविणे, तपास अधिकाऱ्यांनी तपास कार्यवाहीचा तपशील भरणे आदी बाबी यामाध्यमातून यापुढे ऑनलाईन होणार आहेत. या सर्व प्रक्रिया यापूर्वी पत्रव्यवहाराच्या माध्यमातून होत असल्यामुळे विलंब लागत होता. आता ऑनलाईन यंत्रणेमुळे विधीसंघर्षग्रस्त बालकांची देखरेख आणि या प्रक्रियेचे संनियंत्रण ऑनलाईनरित्या करणे सोपे होणार आहे. तसेच सर्व अद्ययावत डाटा वेळीच उपलब्ध होणार आहे.


       कार्यक्रमात जेजेआयएस मोड्यूलचे उद्घाटन, बाल लैंगिक शोषणाच्या अनुषंगाने बालकांचे लैंगिक शोषण, सुरक्षितता त्यांची-जबाबदारी आपली या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन, व्हीसीपीसीसाठी बाल संरक्षणाच्या अनुषंगाने माहितीचा समावेश असलेल्या चित्रफीती, पोस्टर्स आदी साहित्याच्या कीटचे अनावरण यावेळी करण्यात आले. तसेच राज्यात कोविड कालावधीमध्ये विषेश काम केलेल्या आणि सेवा दिलेल्या  महिलांचा गौरव, बाल विवाह प्रतिबंध कामात विशेष कार्य केलेल्या अधिकारी-कर्मचारी आणि संस्थांचा सत्कार, राजमाता जिजाऊ माता-बाल पोषण अभियान अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. कोविडदरम्यान आपल्या प्राणांचीही पर्वा न करता कर्तव्य बजावताना मृत्यू पावलेल्या कोविड योद्ध्यांना यावेळी ॲड. ठाकूर यांच्या सूचनेनुसार श्रद्धांजली वाहण्यात आली


 दिगंबर वाघ  


कार्यकारी संपादक-९४०४४५३५८


 


माझे कुटुंब,माझी जबाबदारी, मास्क वापरा आणि कोरोना योध्दा यांना सहकार्य करा..