मध्य रेल्वे प्रशासनाच्या विनंतीनंतर अवघ्या १५ दिवसात युद्ध पातळीवर काम केले पूर्ण

मध्य रेल्वे मार्गावर १५ ठिकाणी कल्व्हर्टमधील गाळ काढून बृहन्मुंबई महानगरपालिकेने केली स्वच्छता

मुंबई प्रतिनिधी : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात, उपनगरीय लोह मार्गांवर, छत्रपती शिवाजी महाराज स्थानक ते मुलुंड दरम्यान रुळांखालील १५ ठिकाणी नाल्यांच्या बंदिस्त प्रवाह मार्गांची (कल्व्हर्ट) स्वच्छता करून देण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने विनंती केल्यानंतर ही कामे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने अवघ्या पंधरा दिवसात पूर्ण केली आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पावसाळ्यापूर्वी निरनिराळ्या प्रकारची कामे संबंधित खात्यांमार्फत पूर्ण करण्यात येतात. मुंबई महानगर क्षेत्रातील नाल्यांमधील गाळ काढून स्वच्छ्ता करण्याची कामे प्रामुख्याने बृहन्मुंबई महानगरपालिका करते. त्याचप्रमाणे तीनही उपनगरीय रेल्वे हद्दीत लोह मार्गांवरील स्वच्छतेची तसेच रेल्वे रुळांखालून जाणाऱ्या नाल्यांच्या प्रवाह मार्गामधील (कल्व्हर्ट) गाळ काढण्याची कामे रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येतात. रुळांखाली नाल्यांमध्ये पाणी साचून ते लोह मार्गावर येवू नये, यासाठी ही स्वच्छ्ता अतिशय महत्वाची ठरते. 

      मुंबईतील तीनही उपनगरीय रेल्वे मार्गांवर मिळून सुमारे ११६ कल्व्हर्ट आहेत. पैकी पश्चिम रेल्वे मार्गावर ४१ मध्य रेल्वे मार्गावर ५३ आणि हार्बर रेल्वे मार्गावर २२ कल्व्हर्ट आहेत. यातील बहुतांश खुले तर काही बंदिस्त मार्ग आहेत. नाल्यांच्या खुल्या प्रवाह मार्गातील गाळ काढणे तुलनेने सोपे असते तर बंदिस्त प्रवाह मार्गातील गाळ काढून स्वच्छ्ता करणे आव्हानात्मक असते. मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोह मार्गावर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुलुंड स्थानकादरम्यान एकूण १८ ठिकाणी रुळांखालून वाहणारे नाल्यांचे बंदिस्त प्रवाह मार्ग (कल्व्हर्ट) आहेत. तेथील गाळ काढून स्वच्छता करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला अलीकडे झालेल्या पावसाळापूर्व कामांच्या आढावा बैठकीत विनंती केली. मध्य रेल्वेकडे या बंदिस्त प्रवाह मार्गाची स्वच्छता करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री नसल्याकारणाने त्यांनी महानगरपालिकेला रेल्वे हद्दीत हे काम करण्यासाठी विनंती केली. महानगरपालिकेचे आयुक्त  इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प)  पी. वेलरासू ह्यांनी रेल्वे प्रशासनाची विनंती मान्य केली.त्यानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या खात्याने तातडीने कार्यवाही सुरू केली. पाण्याच्या जोरदार फवाऱ्याने गाळ काढणारे फायरेक्स संयंत्र तैनात करून सदर १८ पैकी १५ ठिकाणी गाळ काढून स्वच्छ्ता पूर्ण करण्यात आली. तर संयंत्र पोहोचू न शकणाऱ्या तीन ठिकाणी मनुष्यबळाच्या साह्याने हे काम रेल्वे प्रशासनाकडून केले जात आहे.

      ह्या १५ कल्व्हर्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्थानक ते मस्जिद स्थानक दरम्यान कर्नाक बंदराखाली, भायखळा ते चिंचपोकळी दरम्यान गोदरेज गॅस कंपनीजवळ, करी रोड ते परळ दरम्यान, परळ ते दादर दरम्यान जगन्नाथ भातमकर पुलाखाली, दादर ते माटुंगा दरम्यान माटुंगा रेल्वे कार्यशाळेजवळ, माटुंगा ते शीव (सायन) दरम्यान, शीव ते कुर्ला दरम्यान, कुर्ला ते विद्याविहार अंतरामध्ये विद्याविहार स्थानकाजवळ, कांजूरमार्ग ते भांडुप अंतरामध्ये कांजूरमार्ग स्थानकाजवळ, भांडुप ते नाहुर दरम्यान भांडुप स्थानकाजवळचा नाला आणि मुलुंड ते ठाणे दरम्यान मुलुंड स्थानक पश्चिम बाजूकडील नाला या ठिकाणच्या कल्व्हर्टची स्वच्छता करण्यात आली आहे. विद्याविहार ते घाटकोपर दरम्यान जॉली जिमखाना लगत, विक्रोळी ते कांजूरमार्ग दरम्यान विक्रोळी स्थानकाजवळ आणि कांजूरमार्ग ते भांडुप दरम्यान दातार नाला ह्या तीन बंदिस्त प्रवाह मार्गाच्या ठिकाणी संयंत्र पोहोचू शकत नसल्याने तेथील रेल्वे रुळाखालून प्रवाह मार्ग स्वच्छतेचे काम स्वतः रेल्वे प्रशासनाकडून मनुष्यबळ नेमून केले जात आहे.

       १५ ठिकाणची ही सर्व कामे पूर्ण करताना त्यावर योग्य देखरेख करण्यासाठी महानगरपालिकेचे आणि रेल्वे प्रशासनाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. दिनांक १९ मे २०२१ रोजी सुरू झालेली ही कार्यवाही दिनांक ४ जून २०२१ रोजी पूर्ण झाली आहे. म्हणजेच अवघ्या १५ दिवसात महानगरपालिकेने ही अतिरिक्त जबाबदारी देखील पार पाडली आहे. महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे प्रमुख अभियंता एल.कमलापूरकर, उपप्रमुख अभियंता  प्रशांत तायशेटे, सहाय्यक अभियंता राजेश यादव आणि सहकारी अधिकारी व कर्मचारी यांनी युद्धपातळीवर हे काम पूर्ण केले आहे.

दिगंबर वाघ            
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८