सुशासनासाठी वृत्तीतही बदल हवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या जालना येथील नूतन वास्तूचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्प

जालना प्रतिनिधी (जिमाका) : आपल्या कामामुळे सर्वसामान्य माणसाचे समाधान झाले पाहिजे. त्यादृष्टीने काम करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. सुशासनासाठी वृत्तीतही बदल हवा असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. जालना येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला न्याय मिळेल असा विश्वास देणे गरजेचे आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या येथील नूतन वास्तूचे लोकार्पण आज दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे (दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी) मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे (दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी) धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह (दूरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी) जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख धर्मादाय वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. प्रदीप कुलकर्णी यांच्यासह विधी व न्याय विभागाचे अधिकारी धर्मादाय वकील संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    ठाकरे म्हणाले की प्रशासन आणि जनतेच्या सहकार्यामुळेच कोविड काळात राज्याचं काम देशात उजवं ठरलं. जास्तीत जास्त चांगली सेवा सर्वसामान्य माणसाला देता आल्यानेच जनतेचे प्राण आपण वाचवू शकलो. सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चांगले काम केले. त्यामुळे या कामावर होणाऱ्या आरोपांना घाबरू नये. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की मिळालेल्या अधिकाराचा पदाचा समाजासाठी वापर करणे गरजेचे आहे. केवळ इमारतीचे नुतनीकरण करून चालणार नाही. काम करण्याच्या वृत्तीतही बदल करणे आवश्यक आहे. सुशासनासाठी कार्याच्या पद्धतीत बदल करणे, लोकाभिमूख कार्याची दिशा निश्चित होणे आवश्यक आहे. विधी व न्याय विभागात रिक्त असलेल्या जागा भरण्याबरोबरच आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील.

    पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नातून जालन्याच्या वैभवात भर टाकणारी अत्यंत सुंदर, सुबक अशी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाची नवीन इमारती उभारण्यात आली आहे. धर्मादास रुग्णालयाच्या बऱ्याच तक्रारी असतात. सामान्य माणसांना आरोग्य सुविधा देण्यासाठी या रुगणालयांवर सनियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यात उत्तमरित्या काम करण्यात आले. धर्मादाय संघटनांनीसुद्धा खूप चांगली मदत करत ३ कोटी रुपयांपर्यंतचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी उपलब्ध करुन दिला.मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग म्हणाले की दिवाणी आणि फौजदारी न्यायालयापेक्षा या कार्यालयाचे काम पूर्णत: वेगळे आहे. न्यास नोंदणी कार्यालयाचे काम धार्मिक संस्था किंवा बिगर सरकारी संस्थांशी निगडित असल्याने या कार्यालयाचे काम समाजहिताशी संबंधित आहे. जालना येथे उभारण्यात आलेल्या इमारतीच्या सभोवताली मोठी जागा उपलब्ध आहे तिथे न्यायिक कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची उभारणी, इमारतीला पोहोच रस्ता व्हावा. मुंबईच्या नवीन मुख्य कार्यालयाची पायाभरणी लवकर व्हावी.

    विधी व न्याय विभागाच्या राज्यमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की जालना जिल्ह्यातील विविध धर्मादाय संस्था नोंदणीकृत धार्मिक संस्थांना या इमारतीमुळे चांगली सेवा उपलब्ध होईल, या संस्थांच्या विविध समस्यांच्या निराकरणाला गती मिळेल. जिल्ह्यातील न्यायालये न्यास कार्यालये उत्तम दर्जाच्या सुविधांनी युक्त असावेत हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नेहमी आग्रह असल्याचे सांगत जालन्यातील सर्व नागरिकांसाठी ही इमारत उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केले.धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे म्हणाले की मुख्यमंत्र्यांच्या विशेष प्रयत्नातून कोरोना काळातही ही सुंदर इमारत पूर्ण झाली. जालना येथे स्वतंत्र इमारतीची आवश्यकता होती ती आज यानिमित्ताने पूर्ण झाली.प्रास्ताविक सहधर्मादाय आयुक्त सुरेंद्र बियाणी यांनी तर आभार धर्मादाय वकील संघटनेचे अध्यक्ष पी. डब्लू. कुलकर्णी यांनी मानले.

ॲड.दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८