एनसीसी संचलनात मुलींनी केलेले नेतृत्व महिला सक्षमीकरणाची नांदी -राज्यपाल

प्रजासत्ताक दिन शिबिरात महाराष्ट्राची विजयी पताका फडकावणाऱ्या एनसीसी चमूचे अभिनंदन -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई प्रतिनिधी : नवी दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये महाराष्ट्राचा ध्वज फडकावत तब्बल सात वर्षांनी पंतप्रधानांचे ध्वजनिशाण तसेच सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान प्राप्त करणाऱ्या एनसीसीच्या महाराष्ट्र चमूचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे बोलावून अभिनंदन केले.आज महिला युद्धविमाने चालवीत आहेत. यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनामध्ये महाराष्ट्र एनसीसीच्या ग्रुप कॅप्टन मुलींनी संचलनात तसेच विविध स्पर्धांमध्ये नेतृत्व प्रदान केले. देशात महिला सशक्तीकरणाचा सूर्योदय होत असल्याची ही नांदी आहे असे राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी सांगितले.

    दिल्ली येथून विजयध्वज घेऊन परतणाऱ्या महाराष्ट्र एनसीसीच्या ५७ कॅडेट्स व अधिकाऱ्यांसाठी राज्यपालांनी राजभवन येथे चहापानाचे आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते.महाराष्ट्राचे नाव उंचावते तेंव्हा राज्यपाल या नात्याने आपली मान देखील उंचावते. एनसीसीचे छात्र हे देशाचे उद्याचे नेते असून प्रत्येकामध्ये अपार शक्ती आहे. एनसीसीमध्ये आत्मसात केलेली शिस्त व राष्ट्रनिष्ठा कायम ठेवल्यास युवक सर्व क्षेत्रात प्रगती करतील, असे राज्यपालांनी कॅडेट्सना सांगितले.

राज्यपालांनी यावेळी चमूने पटकावलेली पदके तसेच चषक पाहिले.यावेळी महाराष्ट्र एनसीसीच्या महानिदेशक वाय पी खंडुरी यांनी एनसीसी महाराष्ट्राच्या विजयाची यशोगाथा सांगितली.

हाराष्ट्र एनसीसी चमूचे यश गौरवास्पद -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पंतप्रधान ध्वज सन्मान पटकावणाऱ्या महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसैनिक चमूचा कौतुक सोहळा

    नवी दिल्लीत राजपथावर झालेल्या प्रजासत्ताक दिन संचलनात सर्वोत्कृष्टतेचा पंतप्रधान ध्वज (प्राईम मिनीस्टर्स बँनर) महाराष्ट्राच्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या चमूने पटकावला आहे. तसेच महाराष्ट्र संचालनालयाने सर्वोत्कृष्ट संचालनालयाचे पारितोषिक पटकावले आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी गौरवास्पद असल्याचे उद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. महाराष्ट्र राष्ट्रीय छात्रसेनेच्या या यशासाठी आयोजित कौतुक सोहळ्यात मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.या सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्रीअदिती तटकरे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे राष्ट्रीय छात्रसेनेच्या महाराष्ट्र संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल वाय. पी. खंडुरी तसेच राष्ट्रीय छात्रसेनेचे वरिष्ठ अधिकारी प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी तसेच विविध पारितोषिक पटकावणारे छात्रसैनिक आदी उपस्थित होते. या सर्वांना उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते पंतप्रधान बॅनर सुपूर्द करण्यात आला तसेच विविध पारितोषिक पटकावणाऱ्या छात्रसैनिकांचा सत्कार करण्यात आला.

    उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले एनसीसीच्या चमूने नवी दिल्ली येथील संचलनात उत्कृष्ट कामगिरी करून पंतप्रधान ध्वज मिळवून  महाराष्ट्राची शान वाढवली. महाराष्ट्राचा प्रत्येक युवक हे यश पाहून प्रेरणा घेऊन राष्ट्रकार्यात सहभागी होईल.महाराष्ट्र राज्य हे प्रगत राज्य आहे. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि पराक्रमाचा वारसा आहे.  दिल्ली येथील थंडी आणि पावसाच्या वातावरणातही राज्याच्या या युवकांनी खडतर परिश्रम करुन यश प्राप्त केलेले आहे. भविष्यात यापुढेही असेच यश मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करून पवार यांनी एनसीसी चमूचे अभिनंदन केले. एनसीसीला प्रोत्साहन देण्यासाठी शासन सदैव तत्पर राहील. पोलीस भरतीमध्ये एनसीसी विद्यार्थ्यांना अधिकचे गुण देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल असे  पवार यांनी सांगितले.क्रीडा मंत्री सुनील केदार म्हणाले महाराष्ट्राच्या युवकांनी दिल्लीत मानसन्मान मिळवला ही कौतुकास्पद बाब आहे. युवकांमध्ये एनसीसीच्या माध्यमातून शिस्त निर्माण होते. यामुळे राज्यात जास्तीत जास्त एनसीसी विद्यार्थी घडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील. पोलीस भरतीमध्ये एनसीसीच्या विद्यार्थ्यांना जास्तीचे गुण देण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याचे केदार यांनी सांगितले.

    महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या देशामध्ये सर्वोत्कृष्ट एनसीसी विद्यार्थ्यांनी जे यश मिळवले ते यश मिळवणे खडतर आहे. एनसीसी प्रशिक्षण साधारण नाही. एनसीसी झालेले विद्यार्थी  आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होतात यात मुळीच शंका नाही. ॲड.ठाकूर यांनी चमूचे अभिनंदन केले आणि भावी यशासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी राणे यांनी केले तर आभार मेजर जनरल वाय. पी. खंडुरी यांनी मानले.

ॲड.दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक-९४०४४५३५८८