‘टिटवाळा ते दुर्गाडी’ रिंग रोड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

टिटवाळा-दुर्गाडी रिंग रोड मुळे बाधितांचा पुनर्वसन प्रस्ताव नगर विकास विभागाकडे पाठवावा-मंत्री शंभूराज देसाई

मुंबई प्रतिनिधी : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा ‘टिटवाळा ते दुर्गाडी’ रिंग रोड  हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या रिंग रोड मुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांचे पुनर्वसन करून त्यांना नवीन जागा देण्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेने तत्काळ नगर विकास विभागाकडे पाठविण्याचे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.मंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात टिटवाळा ते दुर्गाडी रिंग रोड मुळे बाधित रहिवाशांचे पुनर्वसनाबाबत बैठक झाली.

    मंत्री देसाई म्हणाले, शहरातील वाहतूक कोंडी कमी करून पर्यायी मार्ग म्हणून आपण रिंग रोडचे काम सुरु आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत कल्याण क्षेत्रातील प्रभाग क्रमांक सहा सात मधून अटाळी आंबिवली या विभागातून जाणाऱ्या टिटवाळा ते दुर्गाडी रिंग रोड मध्ये बाधित रहिवाशांचे पुनर्वसन करायचे आहे. या बाधितांना नवीन जागा द्यायची आहे. रस्ता कामामुळे बाधितांना पर्यायी व्यवस्था दिल्यानंतरच पुनर्वसन करावे.

    पुनर्वसनाबाबत व नवीन जागा देण्याबाबत शासन सकारात्मक आहे असेही मंत्री देसाई यांनी यावेळी बैठकीस उपस्थित बाधित रहिवाशांना सांगितले.या बैठकीस कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे, नगर विकास विभागाचे उपसचिव कैलास बधान, कल्याण डोंबिवली महानगरपालिका उपायुक्त धैर्यशील जाधव, कार्यकारी अभियंता विशाल जांभळे आदी उपस्थित होते.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८