इरशाळगड दुर्घटनेची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून चौकशी मदतीची ग्वाही

इरशाळवाडी येथे ठोकला दिवसभर तळ मुख्यमंत्र्यांनी स्वत:च केले बचाव कार्याचे नेतृत्व

मुंबई प्रतिनिधी चित्रलेखा रासने : विधानभवनातले कामकाज संपवून बुधवारी सायंकाळी नियंत्रण कक्षातून राज्यातल्या मुसळधार पावसाचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अगदी सकाळीच दरड कोसळलेल्या इरशाळवाडीला पोहचले आणि दिवसभर बचाव कार्याचे नेतृत्वच केले.गडाच्या पायथ्याशी येऊन मुख्यमंत्री थांबले नाही तर गडावर चढून उद्ध्वस्त झालेल्या वस्तीवर प्रत्यक्ष पोहोचून त्यांनी संपूर्ण बचाव कार्याचे नियंत्रण केले. भर पावसात विश्रांती न घेता रेनकोट घालून स्वत: बचावकार्यात उतरलेले मुख्यमंत्री पाहून बरोबरचे अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा अवाक झाले.

  विशेष म्हणजे आज विधिमंडळ अधिवेशनाचा चौथा दिवस. मात्र या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांवर कामकाजाची जबाबदारी टाकली आणि स्वत:ला बचावकार्यात झोकून दिले.राज्याचे मुख्यमंत्री आज एका सामान्य कार्यकर्त्याच्या भूमिकेत दिसले. मुख्यमंत्र्यांनी भर पावसात इरशाळवाडीकडे चढाईला सुरूवात केली. चिखलाने निसरडा झालेला रस्ता पायी तुडवत ते वस्तीवर पोहचले. मुख्यमंत्र्यांच्या या धाडसाच सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर सर्व यंत्रणांनी आणखी वेग घेतला. प्रतिकूल हवामान अवघड चढण यावर मात करीत मुख्यमंत्री शिंदे ग्रामस्थांशी चर्चा करीत मजल दरमजल करीत चढण चढत होते.

  मी मुख्यमंत्री असलो तरी स्वत:ला सामान्य कार्यकर्ताच समजतो असे मुख्यमंत्री भाषणांमधून नेहमी सांगत असतात. त्याचा प्रत्यय आज सर्वांना आला. अपघात असो आपत्ती येवो वैद्यकीय मदत असो सामान्यांच्या मदतीसाठी सदैव ऑन फिल्ड असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सामान्यांसाठी असणारी तळमळ आज पुन्हा एकदा दिसून आली. मुख्यमंत्री शिंदे गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास वर्षा निवासस्थानाहून घटनास्थळाकडे निघाले. ते साडेसातच्या सुमारास तेथे पोहोचले. तेव्हापासून त्यांनी अथकपणे मदत आणि बचाव कार्याचे नेतृत्व केले.प्रतिकूल परिस्थितीमुळे पुरेशी यंत्रणा डोंगरावर मदतकार्यासाठी जाऊ शकत नव्हती हे पाहून सकाळी साडेसातपासून ऑनफिल्ड असलेल्या मुख्यमंत्र्यांमधील कार्यकर्ता अस्वस्थ होता. डोंगरावर जाऊन प्रत्यक्ष मदत केली पाहिजे नागरिकांना बाहेर काढले पाहिजे असे ते सोबतच्या मंत्र्यांनादेखील सांगत होते. इरशाळगडाच्या पायथ्याला असलेल्या गावाला बेस कॅम्प करून मुख्यमंत्री केवळ निर्देश, सूचना देऊन तेथून निघाले नाही. त्यांनी परिसरातील औद्योगिक वसाहतींमधील कामगारांना मदतीचे आवाहन केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. दुपारी एकच्या सुमारास भर पावसात मुख्यमंत्री इरशाळगडावर पायी चालत निघाले. पायथा ते दुर्घटनास्थळ हे सुमारे दीडतासाचे अंतर त्यांनी चालत जाऊन गाठायचे ठरवले.

  केंद्रीय गृहमंत्री वायुसेनेचे अधिकारी परिसरातील सामाजिक आणि दुर्गप्रेमी संस्था गिर्यारोहक संस्था यांच्याशी ते सतत बोलत होते आणि त्यांच्याकडून बचावासाठी आणखी काय-काय करता येईल याची माहिती घेत होते. मदतकार्याला वेग येण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.एकीकडे प्रत्यक्ष घटनास्थळी मदतकार्यात सहभागी होताना मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेतील पीडितांचे अश्रू पुसण्याचे काम केले त्यांना दिलासा दिला. जिल्हा प्रशासनाला पीडितांच्या पुनर्वसनासाठी व्यवस्था निवासाची सोय भोजन याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मद

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इरशाळवाडी येथे मदत व बचावकार्याचा आढावा घेतल्यानंतर ग्रामस्थांना भेटून आस्थेने विचारपूस केली. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रूपये तर जखमींवरील उपचाराचा सर्व खर्च शासनातर्फे केला जाईल असे जाहीर केले.तसेच शासनाकडून सर्व मदत करण्याचे आश्वासित केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून चौकशी मदतीची ग्वाही

  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दूरध्वनीवरून माहिती घेतली. त्यांनी बचाव कार्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. लोकांना घटनास्थळावरून बाहेर काढणे आणि जखमींवर तातडीने उपचार करणे हे प्राधान्य असल्याचे केंद्रीय गृहमंत्री श्री. शाह यांनी सांगितले.

पमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली

  इरशाळगड दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.घटना कळताच काल मध्यरात्रीपासूनच मी स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहे.एनडीआरएफच्या तुकड्या घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या आहेत. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यात प्रारंभी अडचणी आल्या मात्र आता मदतकार्य गतीने होत आहे. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत व बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षातून घेतली माहितीउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात पोहचून दुर्घटनेतील नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्याचे संनियंत्रण केले.

खमींची मंत्री अदिती तटकरे यांच्याकडून रुग्णालयात विचारपू

  महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली. रुग्णांवर योग्य उपचार करण्यात यावे आणि या दुर्घटनेतील जखमींची संख्या वाढल्यास प्रशासनाने सज्ज असावे, अशा सूचना संबंधित रूग्णालयाला दिल्यात.यावेळी एमजीएमचे डॉ. सागर पनवेल महापालिकेचे डॉ.गोसावी नायब तहसीलदार पनवेल लाचके उपस्थित होते.

शिवभोजन थाळी पॅकेटचे मोफत वितरण अत्यावश्यक अन्नधान्यही देणा

  शिवभोजन थाळीच्या पॅकेटचे मोफत वितरण दुर्घटनाग्रस्तांना करण्यात येणार आहे. शिवाय पाच लिटर रॉकेल १० किलो तांदूळ १० किलो गहू किंवा त्याचे पीठ इतर शिधा देखील देण्यात येणार आहे.जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत पुरवठा सुरूच राहणार आहे.

संपर्कासाठी हेल्पलाईन क्रमां

   चौक दूरक्षेत्र येथे तात्पुरते कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे. पोलिस निरिक्षक काळसेकर  यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांचा मोबाईल क्रमांक 8108195554 असा आहे.

नागरिकांना आवाहन

  भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे.इरशाळवाडी येथे नागरिकांनी गर्दी  न करण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे.अति मुसळधार पावासाची शक्यता असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये आवश्यक आणि अतिमहत्वाचे काम असल्यासच घराबाहेर पडावे असे आवाहन राज्य शासनाने केले आहे.

दिगंबर वाघ
कार्यकारी संपादक -९४०४४५३५८८